Wednesday, December 15, 2010 | By: सुर्यकिरण

यत्नयज्ञ...

बरं होतं.. हो हो बरं होतं,

मी एकटाच होतो..

शब्दांच वारूळ नव्हतं,

भावनांचं वादळ नव्हतं..

होती फक्त ती एकाकी जाणिव..

अन कसलीतरी वेगळीच उणिव..


बरं होतं .. मी एकटाच होतो..

गर्द सावलीसारखं मी सुद्धा,

कडक उन्हात होरपळत होतो..

बेभान अश्या त्या फाजिल पावसात,

मर्यादा उराशी लपेटून स्तब्ध होतो..


बरं होतं .. मी एकटाच होतो..

लाल निखार्‍याला घट्ट बिलगून...

राख व्हायची वाट पाहत बसायचो,

अन कधीकधी शुभ्र कापर्‍या देहाला,

ज्वालेशी संगत करून मुक्त व्हायचो..


बरं होतं मी एकटाच होतो..

चांदण्यारातीचं एकच ते स्वप्न,

अन पहाटेची ती अविट गोडी..

एवढ्याच काय त्या सवयी..

माझ्या झोपेनं पाळल्या होत्या..

अरेच्या !..खरतर अश्या कित्येक राती,

माझ्या बिछाण्यावर येऊन बाटल्या होत्या..


पण आज किनार्‍यावर आलो,

उभा राहीलो, साद घातली,

लाटांची सलगी पाहीली अन

अचानक आलेल्या वादळानं,

माझ्याच जिवनाची किनार,

अक्षरशः विद्रूपताना पाहीली..


खरं सांगायचं तर ..

आज माझ्याच तळपायात,

माझ्याच विषाचा काटा रुतला,

अन एकला जीव सावरण्या,

यत्न यज्ञांचा होम हवनही..

अखेरीस असफल ठरला..

...असफल ठरला..


-- सूर्यकिरण..

उध्वस्त...

दु:ख विसरण्या आता,

तू मला टाळत गेलीस,
विरहाच्या अघोरी सलांना,
उराशी कवटाळत गेलीस..

चांदण्यांच्या गाव वसताना,
तू वेस लांबवत गेलीस...
रंगता डाव पटावरी,
तू पटले उधळत गेलीस...

मैफिलीचे कळता पडघम,
चाळ पायी तुडवत गेलीस,
दोन फुले मुठीत धरूनी,
माळ सारी विस्कटत गेलीस..
अडवण्यास माझ्या तू,
खोटेपणा ठरवून गेलीस,
हट्टी स्वभावास तुझ्या,
तू का आज गिरवून गेलीस?

उध्वस्त आता दुवे अंतरी,
भविष्य माझे लिहून गेलीस,
तळहाती ठेवूनी हात असा,
हस्तरेषा हळूवार खोडून गेलीस...
हस्तरेषा हळूवार खोडून गेलीस...

- सूर्यकिरण..

राख..

तांबडी वलये दवडत,
आज सांजवेळ झाली,
अडवू कसे अश्रूस आता,
शिंपल्यास आता ओल आली..
अंधार दाटला पार आता,
देऊळी दिवेलागण झाली,
वासराले उरात घेऊनी गाय,
गोंजारत गोठ्यात आली..
चांदण्याचा रंगला सोहळा,
अंगणी रातराणी बहरली,
गंध फुलांचा कितीक हळवा,
वेचण्या झूळूक हळूवार आली..
साधता देह थरथर अशी,
उब मजसी परकी जाहली,
कुस बदलता हळूवार सखे,
स्वप्नेही सारी मोडीत निघाली..

पहाटसुखाची आशा वेडी,
तावदानी हसत उभी राहीली..
मात्र हा क्षण साधया सखे,
फक्त ! अन फक्त !
राख माझी मी उधळू पाहीली...

-- सुर्यकिरण...

विलीन...

तू उमलत राहीलास काट्यात,

अन मी दरवळात मोहीत राहीले..
मला विसरून "ती"च्या केसातल्या,
कळीस का मी माझ्या तळहाती पाहीले..

शब्दांचे मुके भाव घेतल्या ओळींनी,
उगाच मी आयुष्य माझे रंगवत राहीले,
तुझ्या हाती शोभला रुमाल "ती" चा,
अन मी मात्र ओल्या आसवांचे थेंब..
माझ्या पदरास कवटाळताना पाहीले..

ओठांच्या पाकळ्यात साचलेल्या शर्करेस,
तुझा स्पर्शविना धजावणारे वेडेसे कंप,
आज "ती"च्या गुलाबी स्मितहास्यात पाहीले..
अन माझ्यात असलेल्या शृंगारतेस आज,
उगाच मी का विटाळताना पाहीले......

तुझा किनारा तुला लाभता..
अतृप्त सागरास फक्त आभार दिले,
पाहता "ती" ला तुझ्या किनारी,
क्षितीजाच्या तांबड्या वलयांमधे..
हळूवार स्वतःला विलीन होताना पाहीले...

-- सूर्यकिरण..

पानगळ..

मिटता डोळे अलगद,

छळती स्वप्ने हजार,

आठवणींच्या गर्दीत मांडला,

अश्रूंचा हा काळाबाजार...



विरहाची लाट अघोरी,

उध्वस्त करी किनार,

एकांताचे हे सल दुखरे,

शोधती शब्दांचे आधार..



भावनांची विस्कटे रांगोळी,

बरसूनी यातना वारंवार,

शोधण्या वाट क्षितिजाची,

आडवा आला हो अंधार..



उरले फक्त श्वास अंतरी,

जाहला देह आत्म्यास भार,

मृत्यूही शीणला असेल आता,

भोगूनी प्रतिक्षेतला हा थरार..



प्राण जाता, उरी आता

समाधीस शोभेल तो पार,

भेटण्यास येशील जेव्हा,

असेल त्यावरी सजलेला,

पर्ण केशरी वर्णाचा हार...



--- सूर्यकिरण..
Saturday, July 3, 2010 | By: सुर्यकिरण

आठवतयं का गं तुला...

तळ्याकाठी बसून,
गालातल्या गालात हसून,
माझ्या प्रतिबिंबाला दिलेली
ती स्मितेची एक साद..

आठवतयं का तूला...

फेसाळलेल्या लाटांनी,
अलगद किनार्‍यानी मिठित घेतलेलं,
ते सारं डोळ्यात साठवता साठवता,
तुझं डोकं माझ्या छातीवर हळूवार टेकलेलं...

आठवतयं का तूला..

फुलांच्या रंगेबिरंगी दुनियेत,
तू नेहमी स्वतःला हरवून जायची,
तुझे तुलाच मग शोधत असताना,
मलाच मनोमन आठवत रहायची..

आठवतयं का तूला..

तुझा तो नाजूक शैलीतला आवाज,
डोळ्यात सजलेला नक्षत्री साज,
माझ्या चोरट्या त्या कटाक्षाने,
तुझ्या माझात आडवी यायची ती "लाज"

आठवतयं का गं तुला...

वाट बघता बघता आसवांचा धीर सुटायचा,
काजळी पापण्यातून प्रवाह गाली उमटायचा,
मी समोर दिसताच माझ्यावर उगाच रुसून,
तो हळूवार कुशीत शांत व्हायचा..

आठवतयं का गं तूला..

पण तो कालचा पाऊस मुक्यानेच रडलेला,
तुझ्या गैरहजेरीत मी नखशिखांत भिजलेला,
कसे सांगू प्रिये तुला आता,
तु नव्हतीस या सत्याने तो पाऊसही,
माझ्याशी वैर धरून वागलेला..

आठवतयं का गं तुला,

सांग ना एकदा मला,
तुझ्यावाचून तडफडतोय जीव माझा,
अन गर्दितही झालोय मी एकला..

००० सुर्यकिरण ०००

कळपातला पहिला पाऊस...

कळपातला पहिला पाऊस... 

गीत गावे पुन्हा,
ह्या ओल्या पावसाचे,
कसे सांडते पाणी आभाळी,
गोर गरिबाच्या नवसाचे..

भेगाळली भुई आता,
सुखावेल थोडी,
इवलूष्या गवताला,
मिळेल थेंबाची हो गोडी..

वाराही गायील गाणे,
ओला सुंगध लेवून..
काळ्या मेघांचे हो संगीत
जाईल नगरी दुमदुमून..

नाचू लागतील आता,
उघडी नागडी लेकरे,
ओल्या थेंबांचे मोती,
झटकतील हो मेंढरे..

सावर गं ओलं पातळं,
अंगी अलवार झटलेलं,
जणू तान्ह गं पोरं,
थंडीने गारठलेलं...

असं रे कसं तुझं येणं,
क्षणात सारं सुखावूनं
नाचतो बघ आनंद कसा,
एका एका थेंबातून...

-- सुर्यकिरण..

सुर्याचा आला फोन...

आज भल्या पहाटेच फोन वाजला,
receive करताच माझा कान भाजला..
घाबरूनचं विचारलं कोण बोलतयं,
सकाळ सकाळ तुम्हाला काय हवयं ..

तिकडून उत्तर आलं..
मी अकाशातून सुर्य बोलतोय,
मी हसून म्हणालो
कशाला उगाच मस्करी करतोय...

काय काम आहे?
मी सहजच विचारलं..
VRS घेतोय त्यानं
बिन्धास्त सांगितलं..

माझी तर झोपच उडाली,
कारण सागर, झाडे , वेली,
प्राणि पक्षी सगळ्यांनीच माझी,
कॉल वेटिंगवर माझी गोची केली..

ऐकेकाच्या फोनला उत्तर देता देता,
माझ्या नाकी नऊ आले,
सारेच कशे एकदम
राजीनामा द्यायला निघालेअ ओ, आता काय करायचं

मी सुर्याला callback केला
तर out of reach चा रिप्लाय आला,
खिडकीतून पाहतोय तर,
झाडे वेलींचा तांडा निघालेला..

तेवढ्यात पृथ्वीचा sms आला,
समाधी घेतेयं रे मी आता,
good bye करायचं होतं म्हणून,
तुला disturb केलं रे नाथा..

आता अश्या पहाट स्वप्नांचा अर्थ,
तुम्हीच लावून पहा तुम्हाला हवा तसा,
नाहीतर प्रतिबिंबात एकटक पाहता,
तडकन फुटून जाईल सार्‍यांच्या जिवनाचा आरसा..

-- सुर्यकिरण..

जागतीक पर्यावरण दिना निमित्त -उर्जा संवर्धन - काळाची गरज...

गुरांना चारा ....गाटीला पैका घरच्या घरी सामाजिक वनीकरन येता दारी"
सह्याद्री - दुरदर्शन वरील एक जुनी जाहीरात, आठवतेयं का तुम्हाला कि विसरालात आजच्या M tv , F tv च्या भयान मिडिया जगात. काय होतं ह्या जाहिरातीमधे, का ती तेव्हाचं दाखवली गेली अन आज तीचा काय संदर्भ हा प्रश्न तुमच्या मनाला नक्कीच पडला असेल ना ?

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

परम पुज्य जगत गुरू तुकाराम महाराजांनी रचलेल्या ह्या ओळी, याचे भान आजच्या पिढीला, समजाला राहीले आहे काय ? अहो राहिले असते तर आज हे असे झाले नसते. उन्हाळ्यात उन्हाच्या कहराने लोक मरतायेतं, पावसाळ्यातल्या पुरात तर सारं नशिबच हात धुवून वाहून जातोय. ऐन हिवाळ्यातही हिमालयातला बर्फ वितळतोय.हे का अन कशासाठी होतयं याचा विचार केलाय का कधी? नाही ना मग आता करा नाहीतर अजून काही वर्षानी मेंदूला संभाळणारा प्राणी मेंदूएवढाच शिल्लक राहील अन अखेरीस लुप्त होईल ही सारी जिवसृष्टी.
भारतातला अणूकरार सगळ्यांचा आठवत असेल कसा विसरणार .. कारण सरकारच्या बुडाखालची भुई गायब होणार होती ना तेव्हा.. एवढीच ओळख शिल्लक असेल त्या अणूकराराच्या तांडवाची. अरे पण तो अणूकरार कशासाठी, कोणासाठी, काय आहे त्यात, काय होईल त्यापासून याचा विचार का कोण करत नाही. मानेवरचं डोकं गुडघ्यात शाबूत ठेवून आपल ढिम्मासारखं बसायचं अन जे सगळ्यांच होईल तेच माझं होईल तेव्हा जगून घ्या ऐशोआरामात ह्या वृत्तीला पोसण्याचे काम सध्या सुरू आहे. तेव्हा कृपा करून आता तरी जागे व्हा अन उर्जा संवर्धनासारखे दुसरे गुप्तधन नाही हे ओळखून घ्या.
तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित पण एका वर्षाला देशात ५ हजार करोड रुपयांच नुकसान विद्युत उर्जा व्यवस्थापन त्रूटी दुरुस्त करण्यात अन तीची होणारी चोरी यातून होते. मग तुम्हीच सांगा जी आहे ती संभाळण्यासाठीच एवढा खर्च म्हणजे आहेच ना नाकापेक्षा मोती जड. मागच्यावर्षी एका संशोधनातून सांगण्यात आलं की जेवढी उर्जा सुर्याकडून मिळते त्या उर्जेचा योग्य उपयोग करून जर वीज उत्पादन केली तर आज जेवढी उर्जा विज आपण खर्च करतो त्यापेक्षा २० हजार पट उर्जा आपण या जगात निर्माण करू शकतो. पण ह्यावर कोणी गांभिर्याने विचार केला तर काही होईल ना ! अन भारतात अश्या अपारंपारीक उर्जेचा फक्त दिड टक्काच उपयोग केला जातो , जर तोच उपयोग ५० % एवढा जरी केला तरी भारताचं उज्वल देशाचं स्वप्न साकार होण्यास जास्त वेळ लागणार नाही. अन भारतात अश्या प्रकारची उर्जा संवर्धन करण्यामधे तमिळनाडूचा दोन तृतिअंश सहभाग आहे कारण फक्त त्याच राज्यामधे अश्या उर्जास्त्रोतांचा उपयोग अन त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तेव्हा इतर राज्यांना काय धाड भरलीये या बद्दल जाणून घेण्यासाठी ?

610x.jpg
आतंराष्ट्रीय जगताची कच्च्या तेलावरची पकड, इधंनासाठी वापण्यात येणारे नैसर्गिक वायुंचे साठे अन त्यांची उपलब्धता, जागतीक बाजारातली कोळश्याची वाढलेली किंमत या सगळ्यावर गांभिर्याने विचार केला तर नक्कीच आपल्याल्या उर्जा संवर्धनाची गरज आहे हे कळून चुकेल. मान्य आहे कि कोळसा, इधंन वापरून निर्माण केलेली वीज, उर्जा ही सौरउर्जा, पवन उर्जेच्या तुलनेने स्वस्त आहे पण थोड्या नुकसानासाठी आपण दुरचा फायदा का विसरतो हे अजूनही मला समजत नाही कारण सौरउर्जा, पवन उर्जेतून मिळणारी उर्जा, वीज ही नक्कीच मोठ्याप्रमाणात अन जास्त काळ टिकवून ठेवता येणारी आहे हे लक्षात यायला हवं.अन त्यासाठी आपल्याकडच्या लोकांच अज्ञान दुर व्हायला हवं. आज अमेरिकासारख्या बलाढ्य देशात सौरउर्जेसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेवून त्याला त्यासाठी योग्य मोबदला ही दिला जातो अन त्या जमिनीमधे तो मक्यासारखं पिक घेवून वार्षिक उत्पन सुमारे ३०००० डॉलर इतके घेवू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की तिथे ह्यासगळ्याचं एक योग्य ज्ञान तिथल्या शेतकर्‍यांना आहे, त्याचे महत्व त्या लोकांना कळालेलं आहे.

energy-main.jpg
चीन हा पारंपारीक उर्जास्तोतापासून उर्जा बनवणाला अव्वल देश ठरला आहे , सौर उर्जा , पवन उर्जा अन विशेष म्हणजे भुगर्भिय उर्जेचा उपयोग करून मोठ्याप्रमाणात वीज बनवली जात आहे. सोबतचं स्पेन सुद्धा यात अग्रेसर आहे. पारंपारिक सौर प्लेट ही सिलिकॉन पासून बनलेली असते, ही जरी महाग असली तरी तिच्यातून निर्माण होणारी उर्जा खरचं खूप लाभदायक आहे. अन तिच्या महागाईमूळे सौर प्लेटला पर्याय शोधण्याचे काम सुरूचं आहे.हि सौरप्लेट सुर्यकिरणांना थेट उर्जेमधे बदलून आपल्याला वीज मिळते.अन काही राष्ट्रामंधे तर या सौरकिरणांचा उपयोग करून पाण्याला उकळवलं जातं अन त्या पाण्याची गती वाढवून मोठे मोठे टर्बाईन्स फिरवले जातात अन उर्जा निर्माण केली जात आहे.अश्याप्रकारे उर्जा संवर्धन करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वाळवंटांचा, माळरानांचा सहज उपयोग केला जाऊ शकतो अन ही वीज दुर पर्यंत घेवून जाऊ शकतो.

bio fuel.jpg
नुकतीच वर्तमानपत्रात आपण वाचलं के "रेवा कंपनी आता मंहिद्रा सारख्या बड्या वाहन क्षेत्र अग्रेसर कंपनीत विलिनीकरण" काय आहे रेवा कंपनी. रेवा कंपनीने बॅटरीवर चालणारे इंजिन ही कल्पना विकसीत केली अन ती वाहनक्षेत्रात खूप फायद्याची ठरली म्हणूनच आता वाहनक्षेत्रात बहुतांश कंपन्या ह्या अश्याच बॅटरीवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात जनरल मोटर्स, ह्युंडाई या कंपन्यांबद्दल आपल्याला ठाऊक असेलच. या बॅटरीचलित वाहनांमधे प्रदूषण कमी, इंधनखर्च कमी, अन वाहनांच आयुष्य या सगळ्याच गोष्टिंचा फायदा होत आहे तेव्हा हा एक उत्तम पर्याय उर्जा संवर्धनाचा. आणि सगळ्यात अनोखा अन विश्वास न बसणारा एक प्रयोग नुकतचं त्याबद्दल ऐकण्यात येत आहे तो म्हणजे उरलेलं अन्न, खाद्यपदार्थ जे आपण कचर्‍यात टाकून देतो त्यापासून हायड्रोजन निर्माण होतं अन हायड्रोजन हे पेट्रोलपेक्षा तीन पट जास्त उर्जादायी आहे म्हणजे आहे ना पुन्हा लखलाभ. पण हि प्रकिया विकसीत होण्यास आणखी काही वेळ जाईल. आणि हो या पासून मिथेन वायू सुद्धा उत्सर्जित होतो जो एक ग्रिनहाऊस वायू आहे ज्याची क्षमता कार्बनडायॉक्साईड पेक्षा २५ पटीने धोकादायक आहे. तेव्हा ह्या उपक्रमाचा निश्चितच उर्जानिर्मिती अन ग्रिनहाऊस प्रदूषण रोखण्यात दुहेरी फायदा होईल.
एवढं सगळं घडतयं या जगात तरी आपण कुंभकर्णासारखे निपचीत पडून आहोत. तेव्हा आपल्याच हातानी आपणंच एक कानफाटात मारून स्वतःला जागं करण्याची गरज आहे. जर तुम्हाला खरचं या उर्जासंवर्धनाबद्दल कुतूहल वाटतयं तर याबद्दल योग्य मार्गदर्शन घ्या, जाणून घ्या अन तुम्ही सुद्धा हातभार लावा उर्जा वाचवण्यास अन अपारंपारिक उर्जा स्त्रोतापासून उर्जा बनवण्यास. कारण उर्जा ही खरोखर काळाची गरज आहे अन ती वेळेवर पुर्ण नाही झाली तर एवढंच म्हणावं लागेल काळ आला तेव्हा वेळही हाती शिल्लक राहीली नाही.
जगबुडीचं भाकित खरचं जर खोटं ठरवायचं असेल तर उर्जा संवर्धन, वैश्विक तापमान , अन प्रदूषण या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्या.

go-green.jpg
"Energy conservation is the foundation of energy independence. - Tom Allen "
- सुर्यकिरण.

पुन्हा पुन्हा तेच तेच...

पुन्हा एक पहाट
काळ्या रातीच्या स्वप्नाना,
सुर्य तळपत्या उन्हात कष्टकर्माला,
जोडणारी...

पुन्हा एक दुपार,
ओघळणार्‍या घामधारा,
वाढलेला भुकेचा पारा,
यांच्या दुवा साधणारी...

पुन्हा एक संध्याकाळ,
कातरवेळी लाल मळवट
आठवंणीचे एक वाळवंट,
यांच्यात अश्रू ढाळणारी...

अन पुन्हा एक रात्र..
आला दिवस कसा गेला,
याची उजळणी करता करता,
अंगाई गाणारी...

पुन्हा पुन्हा तेच सारे,
नाही कुठले नवे किनारे,
आता पुन्हा उध्वस्त
जगण्यास शिस्त लागेल का रे... ?

-- सुर्यकिरण

भरकटलेला एक नकाशा...

 भरकटलेला एक नकाशा...
जन्मास येता खूप रडलो,
आईच्या कुशीत सुखात निजलो,
बापाचे मात्र संस्कार
कानी पडायचे राहून गेलं,

बालवयात खूप खेळलो,
मातीच्या चिखलात भरपूर लोळलो,
शिक्षणाचं वेड मात्र,
मनी लागायचं राहून गेलं ..

अडाणीच मी तेव्हा,
शेती केली, गुरं वळली,
फळा फुलांशी गप्पा
मारायचं तेवढं राहून गेलं..

कित्येक गायली,
भारूडे अन भक्तीगीते,
देवासमोर झुकायचं,
नतमस्तक व्हायचं तेवढं राहून गेलं..

लग्न केलं संसार केला,
पोराबाळांना आधार दिला,
पण संसाराच्या अस्तिवाशी
एकरूप व्हायचं तेवढं राहून गेलं..

अंती एकदा पाहीला आरसा,
तेव्हा मन उदास होऊन गेलं,
मुक्त आयुष्य जगता जगता,
सुखाने जगायचं तेवढं राहून गेलं...

उतारवयात सतावते आता,
घनघोर काळी निराशा,
मागे वळून पाहिलं जरासं
तर खिजवत होता,
भुतकाळाचा तो दिशाभूल,
भरकटलेला एक नकाशा....

--सुर्यकिरण

देशील का गं मला ?

देशील का गं मला ?
उंच उंच आकाशी,
स्पर्धा माझी गरूडाशी,
जरा जिद्द अशी उरी,
अन बळ माझ्या पंखात
तू देशील का गं मला..

अथांग असा सागर,
काठोकाठ धरेवरची घागर,
ठाव रत्नखजिन्यांचा,
शिंपल्यातल्या शुभ्र मोत्यांचा,
तू देशील का गं मला...

भरली आभाळी जत्रा,
काळ्या निळ्या मेघांची,
थेंबातून उंचावरून कोसळूनी,
तुझ्या देहावर ओघळण्याची जागा,
देशील का गं मला...

सुटला कसा बेभान वारा,
आसमंती पसरला सुगंध सारा,
झुळूक मंद , गुलाबी रंग
शहारस्पर्श रोमा रोमातला
देशील का गं मला..

अखेल खुंटतील थकूनी गात्रे,
पाणवतील पापण्या ओघळतील नेत्रे,
तेव्हा आडोसा सावलीचा,आधार आशेचा
या उरी श्वास शृंखला होऊनी..
देशील का गं मला... 

-- सुर्यकिरण ...
Sunday, June 27, 2010 | By: सुर्यकिरण

क्षणमिलन..

पिक्चर फ्रेम करून माझ्या टेबलावर ठेवलेली ही एक कविता... स्मित
क्षणमिलन..
 
तोडून सारी बंधने,
पुन्हा एकदा भेटलो,
तळ्यातल्यां चांदण्या पाहत,
एका आडोश्याला लपलो..

ती भेट मिलनाची,
अवचित होती घडलेली,
पावले वेगात येताना,
घुंगरे पैंजणाची निसटलेली..

पदर तुझा किनारी,
होता वार्‍याने खेचलेला,
स्पर्श तुझ्या थरथर ओठांचा,
मी हळूवार ओठांनी वेचलेला..

रोमांच बेभान होऊनी
या देही संचारलेला,
स्पर्शवेलींच्या झुल्यात,
झोका उंच आकाशी भिडलेला,

गंध शुभ्र रातराणीचा,
तुझ्या केसात पसरलेला,
रंग गुलाबी तुझ्या गाली,
सखे धुंद बेधुंद झालेला

खरतंर तुझ्यामाझ्या मिठित तेव्हा,
संवादही अगदी अबोल झालेला,
नजरेच्या खाणाखुणांनी अखेर,
मिलनक्षण तो लाजूनी हसलेला... 

-- सुर्यकिरण

एक आठवण -- वेगळीच जराशी...


खूप कंटाळा आलाय,
रोजच्या अश्या जगण्याचा,
नाही उरला छंद कुठला,
आला ऋतू आंनदाने मोहरण्याचा


चल ना रे जाऊया आपण
कुठेतरी दुर दुर निंवात
जिथे असेल एखादी संध्या
अन सुखे सारी अनंत


नको गं, आज नको
मला नाही गं जमायचं,
माझ्या रोजनिशीतलं एखादं
पानं उगाच नाही का वाया जायचं...



तू असा रे कसा वागतोस,
मला मुळीच कळत नाही
विरहात जीव घेतोस माझा,
अन म्हणतो मी अजिबात छळत नाही...


जाऊदेत सोड, मी जाते त्याच्याबरोबर
तुला कायमच कायमच सोडून
मग बसशील रडतं कुढत
मला क्षणा क्षणाला आठवून.


अगं थांब, चाललीयेसचं ना
मग मी सांगतो तिथेच जा
माझ्या स्वप्नातलं ठिकाण
त्याच्या सोबत अवश्य पहा..


उंच असेल एक टेकडी
वाट घाटाची तिला वाकडी
उंच पठारी असेल बसायला,
तीच लाकडाची एक बाकडी..


बसशील तिथे तू जेव्हा,
तो तुझ्या खूप नजिक असेल,
अन समोरून तुला वाहनांची
एका ओळीतली सुरेख आरास दिसेल..


हवाही खेळती असेल,
तुमच्या दोघात,
अन मग आनंद संचारेल,
तुमच्या देहात...


एकत्र येतील कदाचित ती नाती,
विण तुटण्याच्या वाटेवर भरकटलेली,
तुझ्या सहवासासाठी कदाचित त्याचीही
श्वासश्रूंखला अडखळलेली...


मग आवडत्या ठिकाणी जाऊन आल्यावर... तीच्या मनातून काहीतरी...

किती रे प्रेम करतोस माझ्यावर,
मला अजूनही उमगलेच नाही,
तुझ्यासारखं सारं गमवूनही,
हसायला मात्र जमलेच नाही... 


खूप सुंदर होती रे ती संध्याकाळ,
माझ्या आयुष्यात कधी न आलेली,
त्याची अर्धांगिणी असूनही,
आसवांची गर्दी तुझ्यासाठी जमवलेली...


आजही तुझी आठवण येते,
पण तू कुठेच दिसत नाही,
मात्र त्या भेटीच्या क्षणाला आठवून,
हुंदका काढून रडण्यास मी विसरत नाही...


--सुर्यकिरण...

काल आणि आज....

काल तुला मी चिंब ओल्या
सरीत भिजताना पाहीलं,
आज मात्र त्या सरींना
डोळ्यातून ओघळताना पाहीलं...

काल तूला मी गंध फुलांच्या,
गर्दित सुगंधताना पाहिलं,
आज मात्र त्या गर्दिला,
अक्षरशः कोमेजताना पाहिलं...

काल तूला मी चांदण्याच्या
सड्यात लख्ख चमकताना पाहिलं,
आज मात्र त्या सड्यावर,
अमावस्येच्या काळ्या बुरख्याला पाहिलं...

काल तूला मी आरश्यासमोर,
प्रतिबिंबाला स्मित करताना पाहिलं,
आज मात्र प्रतिबिंबाच्या त्या छबीने,
दर्पणालाच नकारलेलं पाहीलं...

सवय झाली होती तुझी मला,
म्हणून याचं कारण विचारून पाहीलं,
कारणाचं उत्तर ऐकताना अगदी,
तुझ्यासारखंच बदलताना मी स्वतःला पाहिलं...

-- सुर्यकिरण...

"गुड बाय टू ऑल ह्युमन बिईंग" ...

"गुड बाय टू ऑल ह्युमन बिईंग" ...

काय दचकलात ना, हे असं कायं शिर्षक दिलंय म्हणून ! हो असचं काहीसं आहे हे मी माझ्याबद्दल नाही लिहीलयं. हे तुमच्या आमच्यातल्या हिडन पण अविभाज्य अश्या घटकाबद्दल लिहीलय अन तो घटक म्हणजे "मन". हो हो तुमचं आमचं मन.
अशक्य आहे पण कधी मनाने ठरवलं की सगळ्या मानवी जातीला गुडबाय करून निघून जायचं तर काय होईल? याचा विचार करा जरा. कारण आपला आपल्या मनावर किती ताबा आहे हे जरा स्वतःला विचारून पहा. क्षणिक सुखासाठी आपण मनाचे काय हाल करतो, कित्येकदा मनाला न पटणार्‍या पण आपल्या फायद्याच्या गोष्टी आपण कळत नकळत कश्या घडवून आणतो. खरतरं या मनाला आपल्या आयुष्यात काही तरी स्थान आहे ते आबादित राहीलंय का सांगा पाहू. कित्येकदा आपण बोलतो की मनात ठरवलं की आपोआप सगळ्या गोष्टी घडून येतात. पण तितक्या तन्मयतेने आपण आपल्या मनाला वाव देतो का? ठाऊक आहे वय जसं वाढत जातं तशी शरीराची जडणघडण होते अन परीणामी मनाचीही होते. पण जडणघडण करून घेणे यात काहीचं वावगं नाही कारण या पृथ्वीतलावरची प्रत्येक जिवसॄषटी आपल्यात बदल करू पाहतेच की. पण आजकाल माणसातले बदल हे मनाविरुद्धच होत चालले आहेत असं नाही का वाटत तुम्हाला.
मुल जन्माला येतं तेव्हा त्याला मन म्हणजे काय हे ठाऊक नसतं ते जस जसं मोठं होत जात तस तश्या त्याचा जिवनाचा प्रवास सुरु होतो.आईला आई म्हणायचं अन ते ही न विसरता आपल्याच आईला आई म्हणायचं हे त्याला कसं बरं कळत असेल. कारण त्याच्या मनात त्या गोष्टी सहज अगदी लाटेवर शिडाची बोट डोलत रहावी ना तसं डोलत असतं अन ते जिवनाचा किनारा येईपर्यंत तसचं राहतं. असचं असतं मन.. पुढे शाळेत जातात मुले तेव्हा त्याना फुले, फुलपाखरं , गोड धोड असं काही आवडायला लागतं ही सुद्धा मनानेच ठरवलेली आवड असते ना? मग आज ती आवड आपण त्यांना ठरवू देतो का. एकदा विचारून पहा स्वतःच्याच मनाला. आजकाल लहान मुलांनासुद्धा संस्कारवर्गाच्या शिकवण्या लावाव्या लागतात कारण मोठ्यांच्या संस्कार मनावर त्यांचा विश्वास राहीलेला नाही का त्यांनी मोठ्यांच्या काळात सुद्धा त्यांनी सुद्धा संस्कारवर्गच लावले होते का. वाल्मिकी ऋषीनी रामायण लिहलं ते त्यांच्या मनात पुढच्या पिढिवर संस्कार व्हावे याच उद्देशाने ना. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना मांडली अन ती पुर्णत्वाला नेली ती सुद्धा याच मनाच्या हाकेतून ना ? मग आज तुमच्या मुलाला का तुम्ही शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक , राजगूरू नाही बनवत ? इंजिनिअर, डॉक्टर , वकिल हेच त्यांनी व्हावं अशी अपेक्षा ठेवून तुम्ही त्यांच्या कोवळ्या मनावर तुमचे हट्ट लादता, ज्यांचे हट्ट करायचे मन त्यांच्यावरचं तुमच्या मोठ्यांचे हट्ट किती विशिप्त वागतो ना आपण याचा विचार केलाय कधी. आहो फुलाला फुलायचंय , सुंगध पसरवायचाय यासाठी तुमच्या सक्तिचा विचार करतं का त्या फुलाचं नाजूक मनं ? नाही ना मग तुम्ही सुद्धा तुमच्या फुलाला-मुलाला फुलू द्या ना जसं फुलायचयं तसं सुगधू द्या ना त्याला त्याच्या सीमेत. तुम्ही फक्त त्याचं मन भरकट्णार नाही यावर लक्ष द्या. अवघड वाटतं का तुम्हाला... ?
तरूणवयातली मने फार डेलिकेट अन सेन्सेटिव्ह असतात असं खूप जण म्हणतात. कारण मुले वाया जाण्याचा तो एकच काळ आपल्या देशात मानला जातो. पण मने वाईट नसतात कधी कधी परिस्थितीने, आपल्या लादलेल्या निर्बंधाने ती मने भरकटतात. तुम्ही दिशा घालून दिल्या की ती मने अपोआप त्या दिशेने आपली वाट ठरवतात अन योग्य ती सीमा राखूनचं. काल वर्तमान पत्रात वाचलं ऑस्ट्रेलियातली १६ वर्षाची वॅट्सन नावाची मुलगी स्वतःच्या जहाजातून सागरी जगप्रवास केला तेव्हा तो प्रवास सुरू करण्यापुर्वी काय आलं असेल तिच्या मनात, तो प्रवास करताना काय अनुभवलं असेल तिच्या मनाने , अन तो प्रवास पुर्ण झाल्यावर कसा व्यक्त केला असेल आंनद तिच्या मनाने याचा विचार केलाय कुणी, नाहितर फक्त तिच्यावर स्तुतीसुमने उधळून तिच्या मनाच्या या कारकिर्दीला एक इतिहास किंवा जी के च ज्ञान म्हणून बंद केलं ना तुमच्या मनात. अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यांच्या मनाची परिक्षने करण्याची गरज आहे. उदा. कृष्णा पाटील, सचिन तेंडूलकर , लता मंगेशकर.. काय घडलं असेल नेमकं, त्यांच्या मनात?
आणखी लोकांचा एक मोठा गैरसमज तो म्हणजे उतारवयाला लागलं की मन बिन काय नसतं , आता फक्त उरलेली आयुष्याची गणितं सोडवायची ती सुद्धा सुटली तर नाहीतर तोपर्यंत आपल्या श्वासांची शृंखला तूटेलच की. अशक्य आहे हे जोपर्यंत हा देह सजिव आहे तो पर्यंत मनाची सूटका होणे अशक्य ! मनाचं कस आहे माहिती आहे का .. पतंगाला व्यवस्थित कण बांधली की मग ती उंच गेल्यावरही काटल्याशिवाय कटत नाही तसचं आहे मनाचं, त्याला योग्य दिशा हवी , योग्य कमांड हवी मग बघा कसं ते वर आकाशी डोलत राहतं.
तुम्ही विचार करायला सुरवात केली असेल वरचं सगळं वाचून की एवढं सगळं लिहिलयं मग कसाब सारख्या विद्रूपलेल्या व्यक्तीचं काय, अतिरेक्यांना पण असतं ना मन मग त्यांच काय ? आहो त्यांच्या मनानेच त्यांचातून सुटका करून घेतली असेल इतके निर्दयी अन पाषाणदेही आहेत ते. आता तुम्ही म्हणाल देवही पाषाण देही आहे मग तो त्यांच्या सारखा कसा नाहीये. आहे पाषाण देहात जरी असला तरी आपल्या मनात त्याच्याबद्दल असणारी श्रद्धा, आस्था अन विश्वास त्याने मोडलाय का कधी सांगा बरं पण ह्या लोकांनी आपला विश्वासचं काय पण मनं सुद्धा बिथरवली आहेत. हत्या अन आत्महात्या यातला फरकं काय सांगता येईल तुम्हाला ? माझ्यामते मनाच्या विरुद्ध क्रुरतेने केलेलं कर्म म्हणजे हत्या, अन मनाच्या विरुद्ध आपल्याच मनाची केलेली हत्या म्हणजे आत्महत्या होय. आज माझा मलाच कंटाळा आलाय हे ऐकून जर मनाने ठरवलं की हे शरीर आपण सोडायचं, जगात चाललेल्या कळत नकळत राग,लोभ, द्वेष या गोष्टींचा मनाला तिरस्कार वाटू लागला तर मनही वैतागून म्हणेल ना कधीतरी... कंटाळा आलाय मला या सगळ्याचा... अ ओ, आता काय करायचं .. अन तो कंटाळा त्याला खरचं असह्य झाला तर .... असोत मला ह्या लेखाच्या शेवटी एक गाणं आठवलं जे आपण शाळेत असताना प्रार्थना म्हणून गायचो..
इतनी शक्ती हमे देना दात, की मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते पे हम से , भूलकर भी कोई भूल ना हो ना...
खरचं क्षणिक सुखासाठी लखलाभ मनाचा बळी देताना आवर्जून विचार करा, कारण अखेर सुख हे मनाच्या सहजतेवर अवलंबून असतं अन ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या मनाला चांगली जमते. मनाला जमवून घेणं पटतं नाही तरी आपण जमवून घेतो, मनाला सामावून घेणं पटतं अन आपण तेच तर करतं नाही. तेव्हा आपल्यातल्या मनाला जपा , त्याला काय हवयं काय नकोयं याचा विचार करा अन खुशाल जिंदगी जगा. कारण त्याने खरचं गुडबाय म्हटलं तर आपल्याला दुखात रडताना खांदा उरणार नाही, माणुसकी , आपूलकी या सारखे शब्द कुठेतरी ऐकले होते असचं म्हणायची वेळ येईल.
रामदास स्वांमीचे श्लोक आठवले.. हा लेख लिहिताना ...
समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक (०१ ते २०)
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।। मुळारंभ आरंभ तो निगुर्णाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ।। १ ।।
मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।।
जनीं निद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य ते सर्वभावें करावें ।। २ ।।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधीं वदावा ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ।। ३ ।।
मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापकामा नको रे ।।
मना सर्वथा नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सारवीचार राहो ।। ४ ।।
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।।
मना कल्पना ते नको विषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ।। ५ ।।
नको रे मना क्रोध हा खेरकारी । नको रे मना काम नानाविकारी ।।
नको रे मना लोभ हा अंगिकारूं । नको रे मना मत्सरू दंभभारू ।। ६ ।।
मना श्रेष्ठ धारिष्ट जींवी धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ।। ७ ।।
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नाववावें ।। ८ ।।
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अति स्वार्थबुध्दी न रे पाप सांचे ।।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दु:ख मोठे ।। ९ ।।
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी ।।
देहेदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकं सदा स्वस्वरूपी भरावें ।। १० ।।
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ।।
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें । तयासारिखें भोगाणें प्राप्त झालें ।। ११ ।।
मना मानसीं दु:ख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ।।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ।। १२ ।।
मना सांग पां रावणा काय झालें । अकस्मात तें राज्य सर्वै बुडालें ।।
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं । बळे लाभला काळ हा पाठिलागीं ।। १३ ।।
जिवा कर्मयोगें जनीं जन्म झाला । परि शेवटी काळमूखीं निमाला ।।
महाथोर ते मृत्युपंथे चि गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ।। १४ ।।
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ।।
चिंरंजीव हें सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ।। १५ ।।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढें जात आहे ।।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यांतें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ।। १६ ।।
मनीं मानव व्यर्थ चिंता वहावें । अकस्मात होणार होऊनि जातें ।।
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । मतीमंद तें खेद मानी वियोगें ।। १७ ।।
मना राघवेंवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।।
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें ।। १८ ।।
मना सर्वथा सत्य सोडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।।
मना सर्वथा सत्य सोडूं नको रे । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ।। १९ ।।
बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तोचि मोठी ।।
निरोधें पचे कोंडलें गर्भवासीं । अधोमूखी रे दु:ख त्या बाळकासी ।। २० ।।
-- सुर्यकिरण..
Sunday, May 2, 2010 | By: सुर्यकिरण

माझा गावं माझे शेत...

वर्षभर मेहनत घेवून , माझ्या शेतातले हे सोनं...



चारही बाजूनी वेढलेले छोटेसे डोंगर अन कुशीत असलेलं माझं शेत...



नभाचा निरोप घेत निघालेला सुर्य ...

मागतो काहीतरी...


कोवळ्या फुलासमान,
मजसी जन्म तू दिला,
आयुष्यं म्हणजे काय,
यासी अर्थ तू दिला..

दिली मायेची गं उब,
दिली प्रेमाची गं मिठी,
मज हाक मारताना,
मध पाझरे तुझ्या ओठी

गोंजारत या देहाला
तू मज वाढविले,
अंगार छेलुन सोसुन,
मला फुलासम जपले..

रागावली कधी नाही
नाही केला राग माझा..
तुझ्याचं मांडीवर निजवताना,
सुखावला तुझा तान्हा..

जाता जाता अंत़काळी
तुला एकची गं मागणे
जन्मोजन्मी तुच आई
या बाळाचे सांगणे..

तु असावीस गाय..
जेव्हा पुनर्जन्म घेवून येईन,
घोटळेन गं तुझ्या पायात..
तुझे लडिवाळ वासरु होऊन..


-- सुर्यकिरण..

ऐ बाबा ऐक ना जरा..


नको रे बाबा मला,
तो चांदण्यांचा झुला,
तो निंबोणीच्या झाडामागचा,
चंद्रच आणून दे ना मला..

नको रे हा असला कापूस ओला,
तो काळा काळा ढंग हवाय रे मला,
कारंज्याचा फवारा काय सारखा सारखा,
तो पाऊस ओलाच आवडतोयं ना मला..

नको रे ती इंजिनाची आगगाडी,
हरणाच्याच गाडीत फिरव ना रे मला,
नको थाट झगमग दुनियेचा असला,
वेली-फुलांच्या देशात घेवून चल ना मला..

नको रे मला हे ब्रेड बटर नी जाम,
साखरेचीच पोळी दे ना रे मला,
रोजचं देतो फ्लाईंग किस ,
आज मात्र गालावर साखरपप्पी दे ना मला...

नको रे तो आयपॉड निजताना,
छानंस गाणंच ऐकव ना मला,
रोजचं निजते तुझ्यापासूनी दुर,
आज कुशीत घेवूनी कुरवाळ ना मला...

--- सुर्यकिरण ---
Sunday, April 18, 2010 | By: सुर्यकिरण

नशिबाने आज थट्टा मांडली....


रोजच्या प्रमाणेच , शितल अरूणला उठवायला त्याच्या बेडरूम मधे गेली. अरूण बिचारा मस्त साखरझोपेची स्वप्न पाहण्यात मग्न असावा, तेवढ्यात शितल त्याला ऊठवून म्हणाली आज ऑफिसला जायचं नाहीये का? आता पुरे झाली झोप ऊठा आता. तोंड जरासं वाकडं करून अरूण उठला, अन म्हणाला ऑफिस , बॉसची कटकट रोजचं तेचं काही नविन घडेल का गं आयुष्यात आपल्या? शितल हसली अन म्हणाली आयुष्याचं माहीत नाही पण आज घडेलं. अरूण म्हणाला आज काय आहे असं, शितलं हसली अन उरका लवकर म्हणून लाजून निघून गेली. अरूण आपला, वेड्यासारखं डोकं खाजवतं शितलच्या बोलण्यावर तर्क करू लागलां , काही सुचलं नाही अन लगेच अंघोळीला निघून गेला.

शितल स्वयपाकघरात मस्त अननस शिरा बनवण्यात व्यस्त होती. हसतं होती, गालातल्या खळीत अगही मधाचे टपोरे थेंब झेलतं. अरूण अंघोळीवरून आला अन तिला मिठीत घेवून पुन्हा विचारलं , राणीं सांग ना काय आहे खास आजं? ती म्हणाली संध्याकाळी बाहेर जाऊ फिरायला मगच सांगेन. येताना जमल्यास लवकर या. मला जेवढी लाडि गोडी लावताय ना अता, तेवढीच बॉस ला लावा म्हणजे लवकर सोडीन तो तुम्हाला. अरूण डोळे मिचकवत निघून गेला, अन ऑफिसच ऊरकून जायला निघाला. पण जाता जाता पुन्हा एकदा त्याने डोळ्याच्या इशार्‍याने शितलला विचारलं सांग ना म्हणून , तेवढयात डोळ्यासमोर हजार चांदण्याचा सडा पडल्याचा आनंद घेवून ती थोडा धिर धरा म्हणाली.अन अरूण बाय म्हणून ऑफिसवर गेला. शितल खुश होती. आनंदात होती अरूणच्या डोक्यात मात्र एकच विचार , काय असेल आज. शितलंचा वाढदिवस तर नाहिये ना? आमच्या लग्नाचा वाढदिवस तर नाहिये ना? या सारखे विचार तो करू लागलां. बस स्टॉप वर सुद्धा त्याच्या मनात हेच सारे प्रश्न.

अरूण ऑफिसात पोहचलां खरं पण सारं लक्ष त्याचं घराकडे अन शितलच्या त्या मधाळ स्मिताकडेच होतं. पुन्हा एकदा त्याला करमेनासं झालं अन लगेच शितलंला फोन लावला. कित्येक वेळ रिंग वाजूनही फोन उचलला नाही यावरून अरूण थोडासा चिडलाही. पण पुन्हा विचारलं काय आहे राणी, सांग ना माझं अजिबात कामात लक्ष लागतं नाहींये. शितल पुन्हा हसली, अन म्हणाली मन लावून काम करा, संध्याकाळी नक्की सांगेन. अरूण बिचारा , फोन ठेवून कामात लक्ष देऊ लागलां, पण शितलचा आनंद आठवून तो मनास तिच्याशिवाय कुठेच एकाग्र करू शकत नव्ह्ता. डबा खायलाही त्याला मन लागत नव्हतं पण शितलंला हे कुठून जाणवलं कुणास ठाऊक तिने फोन लावला अरूणला अन म्हणाली शिरा खुप छान झालाय, माझ्यासाठी खाऊन घ्या, खुप आवडेल तुम्हाला. मीच तिथे येऊन भरवतेय तुम्हाला असं इमॅजिन करा अन खाऊन घ्या बघू.
संध्याकाळचे चार वाजत आले, अरूण इतर वेळी बॉस कॅबिन मधे जायला घाबरायचा पण आज तो थेट गेला, अन म्हणाला आज मला ऑफिसातून लवकर जायचयं. बॉस ही काहिचं न विचारता जा म्हणाला याचं अरूणला खुपचं आश्चर्य वाटलं त्याचा विश्वासच बसेना. "खुशियों कि हो रही हैं बारीश्,तो भगवान भी साथ मे भिग रहा हैं" असचं त्याच्या मनात आलं अन तो बॅग उरकून घरी जायला निघाला. बसस्टॉपचं अंतर इतकं दुर नव्हत तरीही मैलो नं मैल चालल्यासारखं तो धापा टाकत चालत होतां. स्टॉपवर आला बसची चातका सारखी वाट पाहत होता. रोजची ती गुलाबाची फुले विकणारी मधूरा, तिथेच त्याच्या जवळ उभी राहून हसत होती, अन एक तरी फुल घ्या म्हणून आग्रह करत होती. रोजचा कंजूसपणा करणार अरूण आज फुलांचा बुके घेतोय, हे पाहून तीने एक फुल एक्स्ट्रा दिलं त्याला अन म्हणाली माझ्याकडून दया तुमच्या बायकोला. अरूण हसला अन नक्की देतो म्हणाला.

बस येत होत्या पण थांबत नव्हत्या, अरूण चिडत होता , मनातल्या मनात शिव्या देत होता. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या पलिकडून एक बाई येताना दिसली, तिच्या डोक्यावर भलं मोठं ओझं , पाठिवर बांधलेलं नागडं लहान पोर, अन बोटाला धरलेली झिंज्या सावरत पुढे पुढे आईला खेचणारी पोरं दिसली. त्याला ते पाहून गरिबी काय असते याचं दर्शन घडतं होतं. त्या बिचार्‍या बाईला हा आयुष्याच्या ओझ्याचा बोजा घेवून बस रस्तादुभाजकावर असलेल्या झाडाखालचा अडोसा हवा होता. अरूणला ते पहावलं नाही थोडया वेळासाठी आपलं वैयक्तिक आनंद विसरुन तो त्या बाईच्या मदतीसाठी धावला. अन तिच्या जवळ जाऊन मदत करू का म्हणून विचारलं तेव्हा त्या बाईच्या डोळ्यातून टचकन पाणी आले अन हो म्हणाली, अरूणने तीच्या डोक्यावरचं ओझ घेतलं अन त्या पोरीला बोटाला धरून चल म्हणाला. रस्ता क्रॉस झाला, त्याने ओझ त्या झाडाखाली ठेवलं अन पोरीला तिथे बसवून, तिच्या हातात एक गुलाबाच फुल दिलं तो पर्यंत त्या पाठीवरच्या पोरालां उराशी कवटाळून ती झाडाखाली येवून बसली. अन म्हणाली दादा, खुप उपकार झाले तुमचे. अरूण सुद्धा गहिवरून आला ते ऐकून. तेवढ्यात त्याची बस समोर स्टॉपवर थांबतेय हे पाहून शितल अन लवकर घरी जायची आठवण त्याला झाली. तो बस च्या दिशेने धावला, बस जवळ गेला .. बस निघत होती अन तो बस मधे चढायची घाई करत होता, मधुरा अन इतर लोक अहो थांबा पडाल खाली म्हणून ओरडत होती पण अरूण त्याच्या धुंदित होता. अन फक्त तिन बोटांच्या आधारावर तो बसच्या दरवाज्याला लटकला, सिग्नल बर बस येताच ड्राइव्हर ने महाभारतात रथाचा आसूड खेचावा तसा ब्रेक दाबला अन अरूणचा तोल गेला अन तो खाली पडला,तो थेड त्याच्या डोक्यावरचं अरूण कसाबसा सावरणार तेवढ्यात वाळून भरलेला ट्रक वाहतूक पोलिसांना चुकवत, तिथून भरदाव वेगाने निघून गेला.

गर्दि जमली, ट्रफिक जाम झाला , पोलिस आले. लोकं तोंडावर हात घेवून बघतच राहीले. काय झालं काही कळेचं ना, त्या तिकडून ती लेकराची माय सुद्धा पाहू लागली. मधूराही गर्दिजवळ धावली अन पाहून सुन्न होऊन बेशूद्धच झाली. क्षणात गर्दिने फुललेला तो चौक ग्रहण लागल्यासारखा शांत झालां. अरूण रक्ताच्या थारोळात , निवांत निजला होता,ती फुले आपल्या छातीला कवटाळून, फुलाची एक पाकळीही चुरली नव्हती पण अरूणचं मस्तक छिन्नविछिन्न झालं होतं. पोलिसांनी गर्दिला पांगवलं अन अ‍ॅंबुलन्स आली, अरूणला दवाखान्यात नेलं, अन कोणीतरी त्याच्या मोबाईल बरून लास्ट डायल कॉल वर फोन लावला,तो थेट शितललाच केला. शितलं काही ऐकून घेण्याआधीच मला ठाऊक होतं आजही तुमच्या बॉसने सोडलं नाही अन तुम्ही लवकर आला नाहीतं पण तो माणूस ओरडला, अन म्हणाला अहो ऐकून तर घ्या तुमच्या नवर्‍याला अपघात झालायं , अमुक हॉस्पिटल मधे लगेच या, शितल हे ऐकून जागेवरच बसली. काही वेळानंतर ती निघाली, हॉस्पिटल मधे पोहचली तेव्हा खुप उशिर झाला होता. तिच्यासाठी कधी नव्हे तो लवकर निघाणारा अरूण कायमचा झोपी गेला होता. हे पाहून शितल , मोठ्या मोठ्याने रडू लागली. तेवढ्यात मधूरा , तिच ती फुलवाली तिच्या जवळ आली अन शितलला कवटाळून म्हणाली, मी पाहिलं त्यांना आज ते तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी जगलेलं. तेव्हा मधुराने सर्व हकिकत सांगितली शितलला. शितलं सारं ऐकून अरूण जवळ गेली अन मिठित घेवून म्हणू लागली, अरे अरूण उठ ना, किती झोपतोयेस, आपल्याला बाहेर जायचयं ना फिरायला ? तु उठ आता डोळे उघडं. थांब तुझ्या कानात सांगितल्यावरच तू डोळे उघडशील. ती त्याच्या कानाजवळ गेली अन म्हणाली अरे अरूण वेड्या तू बाबा होणार आहेस बाबा, एवढं देखील कसं कळलं नाही तुला. चल उठ आता अन हे म्हणत म्हणत रडत रडत शितल कोसळली.
आता तुम्ही सांगा चुक कशाची होती? इथे कोणाची नशिबाने थट्टा मांडली? अरूणची, शितलची, की त्या जन्माला येणार्‍या कोवळ्या कळीची ?



चुक नव्हती कोणाची,

तरीही नशिबाने थट्टा मांडली,

तहानलेल्या संसारासमोर,

सुखाची घागर क्षणात लवंडली...

-- सुर्यकिरण





वाचकांनो , माझी ही कथा काल्पनिक आहे. पण खरोखरचं हि वाचताना मी ही इतका भावूक झालो होतो की डायरीत पुन्हा लिहिताना मी ती अर्धवटच लिहिली. अन तसा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा चुक भुल माफ असावी. तुम्हाला आयुष्य नेहमी सुखाचे, समृद्धिचे अन सुखाचे जावो हिच प्रार्थना.
Sunday, April 11, 2010 | By: सुर्यकिरण

येवून जा...


कधी समजून घ्यायचं असेल प्रेम,
तर नजरेत माझ्या चमकून जा..

कधी बोलायचं असेल माझ्याशी,
तर स्वप्नांत माझ्या येवून जा..

कधी अनुभवायचा असेल स्पर्श माझा,
तर ओल्या धुंद ओठास माझ्या स्पर्शून जा..

कधी ऐकायचे असे संगीत मनातले,
तर तारा ह्रिदयाचा तू छेडून जा...

कधी छळेल एकांत तूला तेव्हा,
वाटेत मला नक्की भेटून जा...

कधी वाटेल भय जगण्याचे तूला,
तेव्हा थेट माझ्या मिठीस घट्ट बिलगून जा...



-- सुर्यकिरण..
Saturday, April 10, 2010 | By: सुर्यकिरण

माझी काय चूक होती.. (जरूर वाचा )


स्त्री म्हणून आली जन्माला
त्याच माझी काय चूक होती,
वासनेने भुकेलेल्या गिधाडाची नजर,
तुम्हा नर जातीतच होती..

मला मिळालं स्वातंत्र्य,
मुक्तपंखांनी वर आकाशी उडण्याचं,
त्यावरही ह्या समाजाची,
सतत कुरबूर होती..

आले मी कोवळ्या वयात,
लागले हसू गालातल्या खळ्यातं,
चमकू लागले ज्वानीचे मोती,
माझ्या गं या गळ्यात..

अन अचानक घात झाला,
रातीच्या चांदण्यात,
पदरावर माझ्या तो
राकट हात आला...

लूटून नेली रत्ने सारी,
माझ्या या नाजूक सौंदर्याची,
आता उरलीये फक्त मी,
खोल जखम घेवून बलात्काराची..

ना तो वरचा आला वाचवायला,
ना क्षण मिळाला निसटून जायला,
अब्रुचे तोडलेच होते लचके त्याने,
मग का जिंवत सोडले,
असे क्षणा क्षणाला मरायला..

-- सुर्यकिरण
Sunday, February 28, 2010 | By: सुर्यकिरण

आजही आठवतेय मला..


आजही आठवतेय मला..



आजही आठवतो मला,

तुझ्या तो पापण्या झुकवून,

केलेला गुलाबी सलाम..



दुरून अशी येताना,

पदर सावरूनी तू,

केलेस त्या वार्‍याला गुलाम..



आजही आठवते मला,

तुझ्या शहारलेल्या देहाची,

अलवार अशी थरथर..



मिठीत विरघळता माझ्या,

मिटून घ्यायची किनार पापणी,

तेव्हा पडायचा जगाचाच विसर..



आजही आठवतेय मला,

तुझ्या केसात माळलेली फुले,

शुभ्र सुगंधी मोगर्‍याची..



गळून पडायची ती ही अलगद,

गुलाबी धुंदीत आपल्या,

अन काय तू लाजायची...



आजही आठवतेय मला,

ती सांज खूळी यायची,

घेवून परतीची वेळ बोचरी..



निघायचीस तू जड पावलांनी,

सोडून अर्धवट ती शृंखला स्पर्शाची,

दाखवून स्वप्ने सुखाची हजार,

क्षितीजाआड कुठे नाहीशी व्हायची?



-- सुर्यकिरण..

Thursday, February 25, 2010 | By: सुर्यकिरण

माझ्याशी लग्न करशील?


माझ्याशी लग्न करशील?

ओढ अनाम श्वासांची,
अन क्षणाचा हा दुरावा,
सांग का आता आपण,
सहन करत रहावा

तु माझ्यासाठी अन मी
फक्त तुझ्याचसाठी
असे असतानाही
का करतो चोरून भेटी गाठी

का आता मिठिसाठी,
हवाय झाडामागचा अडोसा,
हातात हात धरण्यासाठी
कशाला हवाय कोणाचा भरोसा..

विश्वास आता कायम आहे
आपल्या दोघांच्याही श्वासात,
मग कशाला जगायचे आपण
क्षणात विरणार्‍या गुलाबी आभासात..

आता हवीये तू मला
माझ्या या सहजिवनात,
मळवट कपाळी भरूनी,
जोडवी घाल तुझ्या पायात

धागा आयुष्याचा बांधीन,
मी तुझ्या गोड गुलाबी गळ्यात,
अन होईल मी एकरूप तुझ्याशी,
मधूचंद्र चांदण्याच्या खळ्यात..


-- सुर्यकिरण

कविता - माझी मैत्रीण..


कविता - माझी मैत्रीण..


तू नव्हतीस तेव्हा,
कविताच माझी मैत्रीण होती,
रक्ताच नव्हतं नात कोणतं,
तरीही माझ्या रक्तात ती वाहत होती..

तू आलीस अन शब्दांना,
परीसाचा स्पर्श लाभला,
तुझ्यावर लिहिताना गजल,
भावनांना नवा हर्ष लाभला..

तुझ्यावर लिहित गेलो,
अन तुझ्या प्रेमात पडलो,
तुझ्या काळजाचा विश्वात,
स्वत:लाच विसरून गेलो...

रोज शब्दातून तुला भेटयचो,
ओठातलं सारं काही नेहमी,
माझ्या कवितेतून थेट तुझ्या,
मनालाच सांगत रहायचो..

जेव्हा मला वाटलं होतं,
कि तुला डोळे भरून पहावं,
पण शब्दात जगणारा मी,
मुखवट्यातूनच आपलं जगणं असावं..

तू सोदून गेलीस मला,
पण माझ्या कवितेने जपलय तुला,
मी तुझीच आहे रे पण,
दुर नको जौ देऊ त्या मखमली फुला



-- सुर्यकिरण
Sunday, February 21, 2010 | By: सुर्यकिरण

अतृप्त...


अतृप्त....


मदनाचे घुमले वारे,
झिंग आली अता अंगा,
कुठे भेटेल मज रती,
एकदा तरी सांगा..

देही वणवा पिसाटला,
अंग अंग शहारले,
ओठांच्या या किनार्‍याला,
गुलाबी लाटांनी स्पर्शले..

श्वासांचाही सोसवेना भार,
काळीजातही धडधड होतेय,
डोळे घट्ट मिटूनी घेता,
तुझी मखमला काया खुणावतेय..

स्पर्शालाही आले उधाण,
ना उरली आता मर्यादेची जाण,
रुप तुझ अप्सरा समान,
जणू सौंदर्याची तू खाण..

होऊदे एकरूप या देही,
अगदी रोमा रोमातूनी,
पाझरूदे कुंभ प्रितरसाचे,
अगदी काठ देहाचे ओसांडूनी..

नाही निजणार काया,
जरी येईल पहाट बोलवाया,
रंगलाय आता हा खेळ प्रितीचा,
नाही शमणार धुंदवेडी काया...

-- सुर्यकिरण...

मैफिल..


मैफिल..

माझ्या हसण्यापरी सये,
तुझे स्मितचं होतं सुंदर,
जणू उगवतीच्या पदराला,
नाजूक अशी झालर...

मिठित तुझं येणं अन,
स्पर्शाची मोहीनी घालणं,
देहावरचं जणू गुलाबी,
स्पर्शांच नक्षिदार गोंदणं..

तुझ्या ओठांवरचे मखमल,
जणू मधाचा गं सागरं,
बिलगता ओठांच्या पाकळ्या,
घडतो रातीचा गं जागरं..

डोळ्यात गं तुझ्या राणी,
मदहोश अशी ती नजर,
रोखून धरता एकटक तीला,
पडतो मज स्वत:चाच विसर..

सोबत तुझी म्हणजे ,
सखे मैफिल गं आयुष्याची,
मग कशास हवाय घोट मदिरेचा,
रोमारोमात आता भिनलीये नशा,
तुझ्या मदमस्त कौमार्याची...

-- सुर्यकिरण ..

होकार...


माझा होकार दिसेल तुला,
माझ्या या नजरेत..

माझा होकार दिसेल तुला,
काळजाच्या स्पंदनात..

माझा होकार दिसेल तुला,
माझ्या स्पर्शाच्या उमलत्या कळीत..

माझा होकार दिसेल तूला,
बंद ओठांच्या पाकळीत..

माझा होकार दिसेल तुला,
माझ्या चाफ्याच्या भरल्या ओंजळीत..

माझा होकार दिसेल तुला,
प्रेमासाठी फैलावलेल्या झोळीत..

माझा होकार दिसेल तूला,
वर आकाशाच्या निळाईत..

माझा होकार दिसेल तुला
सागराच्या गहिर्‍या पातळीत..

माझा होकार दिसेल तुला,
दाही दिशांच्या अंतरीत..

माझा होकार दिसेल तूला,
अखेरच्या श्वासातही,
मालवेल अखेर ज्योत प्राणाची,
तव दिसेल होकार माझ्या आत्म्यातही...

--- सुर्यकिरण ---

सावळा जीव माझा..


सावळा जीव माझा..


सावळ्या हरीची,
का भावते प्रीत तूला,
इतकं मनात प्रेम तरी,
का हा असा अबोला?

पाहते वाट त्याची,
रात रात जागूनी,
क्षिणती डोळे थकते गात्र,
तरीही का अस खुळेपणा..

रचते ओव्या आठवणीत त्याच्या,
शब्द फुलांची गं विणते माळ,
भेटते स्वप्नी त्या वेड्यास,
अन दाटून येते तुझ्या मनाचे आभाळ..

कधी भेटशील तू त्याला,
पदराआडून नजरेत भरशील त्याला,
त्याच्या सावळ्या देहास स्पर्शून,
तुझं सर्वस्व दे आता त्याला..

अडवू नकोस अशी आता,
पैंजण वेड्या पावलांना,
धावत जा त्याच्याकडे,
तोडून तुझ्या सार्‍या बंधनांना..

- सुर्यकिरण -

"अल्विदा"


"अल्विदा"

चंद्रही नाही आज,
चांदण्याही गेल्या लपून,
कुठे हरवला वारा,
नाजूक कळ्यांना हिरमूसून..

पायवाटा दिशा हरवल्या,
अदृश्य जाहल्या सावल्या,
वाट तुझी पाहताना,
मुसमुसल्या नयन बाहूल्या..

निद्राही झाली गायब,
अन स्व्पने झाली भकास,
क्षणा क्षणाला छळतो आहे,
आठवणीचा मुका सहवास..

शब्द सारे सांडले,
भावनांशी उगाच भांडले,
तुझ्याविना सये माझ्या कवितेने,
जगासमोर दारिद्र्य मांडले..

वळूनी बघ एकदा,
तुझाच मी सखासर्वदा,
नतमस्तक माफ़ी मागतो आता,
नको म्हणूस कायमचा "अल्विदा"

-- सुर्यकिरण

नको विसरूस मला..



नको विसरूस मला..
 
अजूनही मी तुझाच आहे,
तुझ्या काळजाचा श्वास आहे,
नको विसरूस मला..

तुझ्या वेड्या चांदणीचा,
एकलाच असा चंद्र आहे,
तुझ्या आठवणीच्या लाटांना
कवेत घेणारा समुद्र आहे..
नको विसरूस मला..

अजूनही ठेवलाय जिंवत,
स्पर्श तुला सुखवणार्‍या मिठीचा,
अजूनही दरवळून जातो सुंगध,
तुला बेधुंद करणार्‍या कळीचा..

अजूनही मी पाहतो स्वप्ने,
तुझ्या सोबत जगलेली,
काहीशी पुर्ण तर काहीशी,
अर्धवट तुझ्या आठवणीत भिजलेली..

आजही भांडतो पावसाशी,
वैर श्रावणसरींशी मी घेतो,
तुला नजर लावणार्‍या त्या थेंबाना,
आज मी जिव्हारी गं लावतो..

आजही वाट पाहतात,
डोळे माझे पाणावलेले..
तू पाठमोरी होताना,
अक्षर: माझे गात्र क्षिणलेले..

नको विसरूस मला,
होते आपले नाते जुळलेले,
सरणावरचे प्रेतही माझे,
मोक्षासाठी तुझ्या मिठिसाठी तरसलेले...

--सुर्यकिरण--


Saturday, February 20, 2010 | By: सुर्यकिरण

माझी ओळख ...

मी सुर्यकिरण ,
नाव काहिस वेगळं वाटतय ना, मलाही तसचं वाटलेलं जेव्हा मला नावं म्हणजे काय असतं ते कळालं तेव्हा ! नावात काय ठेवलयं ! असोत.. मी एक सुशिक्षित पण बेकार नाहीये.. सध्या जनरल मोटर्स मध्ये नोकरी करतो.. सुरुवात आहे ही माझ्या व्यावसायिक आयुष्याची तेव्हा, बघुयात कसा कस लागतोय माझ्या कष्टाचा अन परिश्रमांचा.. मी पुण्यातला .. हो त्याच पुण्यातला ज्या शहराचा एकेकाळी शांत, सुसंस्कृत, अन विद्येचं माहेरघर म्हणूण लौकिक होता.. पण अता.. जाऊदेत... मला वाचायला खुप आवडतं त्यामूळे वर्तमानपत्रातले लेख, पुस्तके वाचतो मी अन कधी कधी इंटरनेटवरही वाचतो.. त्यातूनच मला लिहायची सवय लागली अन ह्या सवयलीला माझं व्यसन बनवण्यासाठी आज मी तुमच्या समोर माझा एक ब्लॉग घेवून येतो आहे.. तेव्हा जरूर तुम्ही इथे हजेरी लावावी अन तुमचे अभिप्राय, सुचना मला सांगाव्यात...
धन्यवाद.
सुर्यकिरण..